Archive for the 'Marathi Online' Category

July 20th 2008

मराठी भाषेचं भवितव्य

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी, तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी केलीच जातात. साहित्य संमेलनाच्या मोसमात तर हमखासच. पण यंदाच्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांचा यासंदर्भातील दृष्टिकोन निव्वळ या प्रतिपादनांपुरता मर्यादित नाही. भाषेच्या प्रश्ानचा अत्यंत व्यापक असा आढावा घेत त्यांनी त्यावर तितकाच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असा अॅक्शन प्लान सुचविला आहे. महाराष्ट्र टाइम्सचे गेस्ट एडिटर म्हणून संमेलनाध्यक्षांनी लिहिलेला हा विशेष लेख.

भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नसून भारतातील सर्व भाषक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. आणि थोडी देशाबाहेर दृष्टी टाकली तर जगातील सर्वच लोकांना आपापली भाषा कशी वाचवायची आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे कसे रक्षण करायचे असा प्रश्न पडू लागला आहे. त्याला इंग्रजी भाषेची मायभूमी ब्रिटन आणि आता अमेरिका यांचाही अपवाद नाही. हजारो वर्षांत जगातील विविध भाषांचा एकमेकांशी जेवढा संपर्क आला नसेल तेव.ढा गेल्या शंभर वर्षात आला. पण गतशतकाच्या शेवटच्या दशकात डिजिटल क्रांती वयात आल्यावर परस्पर संवादाचा वेग आणि आवाका प्रचंड प्रमाणावर वाढला. वाहतुकीची साधने आणि त्यांची गती वाढली. त्यामुळे जगातील सर्वभाषक लोकांचा विविध आघाड्यांवर, विविध क्षेत्रांत परस्परांशी इतका व्यापक आणि विस्तृत संपर्क व संवाद होऊ लागला आहे की त्याला मानवी इतिहासात तुलना नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान वाढीच्या गतीने प्रवेग घेतला असताना करमणुकीपासून तो विज्ञान-शास्त्रांपर्यंत बहुतेक विषय सर्वांना समजू शकतील अशी जागतिक भाषा उत्क्रांत होणे अपरिहार्य आहे. सर्वांना भीती तीच आहे - या जागतिक सुपर-भाषेपुढे आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा कसा टिकाव लागणार? युरोपातील छोट्या देशांमधील भाषांनाच नव्हे तर जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज अशा समर्थ भाषांपुढेही हा पेच पडला आहे. चिनी आणि रशियन भाषकांनी जगाच्या बाजारात टिकाव धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे. तिकडे इंग्लंड-अमेरिकेत मात्र आपलीच भाषा आपल्याला अनोळखी होते की काय अशी चिंता वाटू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या भवितव्याबद्दल गंभीर विचार व्हायला पाहिजे. खरे म्हणजे महाराष्ट्राचा प्रश्न जेवढा गंभीर आहे तेवढाच तो तामीळनाडु, कर्नाटक, आसाम आणि बंगालचाही आहे. फक्त या भाषकांची सरकारे आणि लोक अस्मिता व संस्कृती संरक्षणासाठी टोकाची अतिरेकी भूमिका घेतात तसे महाराष्ट्रात होत नाही. हे औदार्याचे आणि सहिष्णुतेचे लक्षण वरवर वाटत असले तरी
वस्तुस्थिती अशी आहे की मराठी माणसाचा न्यूनगंड, भाषेबद्दलची बेफिकीरी आणि शासनाचा व मराठी बुद्धिवंतांचा बोटचेपेपणा आणि इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टीच वरील सदगुणांना कारणीभूत आहेत असे म्हणावे लागेल. त्यामुळे भाषेची अधिक हेळसांड होते ही दुदैर्वी वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ महाराष्ट्राने कानडी किंवा आसामी अतिरेक्यांप्रमाणे वागावे असा नव्हे. उलट भाषेच्या प्रश्नाकडे
व्यापक परिप्रेक्ष्यातून सुसंस्कृतपणे कसे बघावे त्याचे दिशादर्शन महाराष्ट्र करू शकतो. मात्र त्यासाठी देखील आपल्या सत्ताधाऱ्यांना आणि सांस्कृतिक पुढाऱ्यांना इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी हवी.

खरे म्हणजे संपूर्ण भारतानेच भाषाप्रश्नाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. घटनासंमत अशा २१ अधिकृत भाषा भारतात असल्या तरी एकूण १७०० बोलीभाषा मातृभाषा म्हणून वापरल्या जातात. जगातील दुसऱ्या कोणत्याही देशात एवढे भाषावैचित्र्य आढळणार नाही. भाषा हे निव्वळ संवाद साधन नसून तिचा संबंध इतिहास, संस्कृती, अस्मिता आणि वंश यांच्याशीही जोडला जातो. हे स्फोटक मिश्रण भारतात ठासून भरलेले
आहे. पुढील काही वर्षांत म्हणजे आथिर्क प्रगतीची घोडदौड होत असताना हे भाषिक व सांस्कृतिक संघर्ष वाढणे अटळ आहे. म्हणून भारताची एकता टिकवून प्रगतीची वाटचाल कायम ठेवण्यासाठी भाषेचा प्रश्न चिघळण्याआधीच ऐरणीवर घेणे आवश्यक आहे. औदार्य व सहिष्णुता हे जे गुण मराठी माणसाला अनाहूतपणे चिकटले आहेत त्यांचा फायदा घेऊन महाराष्ट्र या विषयात धोरणात्मक पुढाकार घेऊ शकतो.

करायचे काय आहे? हिंदीसह भारतातील बहुतेक भाषा या उत्क्रांत होणाऱ्या जग-व्यवहाराच्या भाषेशी स्पर्धा करू शकणार नाहीत. त्यामुळे बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व व्यवहार यासाठी जागतिक भाषा, आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व साहित्य व्यवहार यासाठी राज्यभाषा म्हणजेच मातृभाषा आणि व्यवसाय व भौगोलिक स्थानपरत्वे इतर
संपर्कभाषा. दिल्ली, मुंबई, बंगलोर अशा शहरांतील प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील मुले अशी बहुभाषक बनतात. त्यांचे प्रमाण इतरत्रही पसरत आहे. प्रश्न आहे तो आपापल्या मातृभाषांचे संवर्धन करण्याचा, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे व साहित्याचे संचित जपून त्याचे प्रतिबिंब जागतिक भाषेत नेण्याचा आणि अस्मिता रक्षणाचा. बालकांची आकलनशक्ती मातृभाषेतच अधिकतर तीव्र आणि परिपूर्ण असते
या जगमान्य सिद्धांताचे काय झाले याचा शोध घ्यायला हवा. त्यामुळे जागतिक भाषेची तोंडओळख करून घेत असताना प्राथमिक ज्ञानग्रहण मातृभाषेत झाले पाहिजे हा आग्रह कितपत योग्य आहे याचीही शहानिशा झाली पाहिजे. भारतीय राज्यांची भाषिक पुनर्रचना करतांना जो सिद्धांत गृहित धरला होता त्याचा नीट पाठपुरावा ना केंद सरकारने केला ना राज्य सरकारांनी. या गोष्टीचीही झाडाझडती झाली पहिजे.

इच्छाशक्ती आणि कळकळ असेल तर महाराष्ट्र या विषयात पुढाकार घेऊ शकतो. त्यासाठी सध्याच्या भाषा व साहित्यसंबंधी असलेल्या शासकीय संस्थांना बाजूला ठेवून उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाषातज्ज्ञांचा भाषा आयोग निर्माण करता येईल. त्यामार्फत महाराष्ट्रातील भाषा प्रश्नाचा जागतिक व भारतीय पार्श्वभूमीवर समग्र व सखोल अभ्यास करून मराठी भाषेच्या वर्तमान व भवितव्यविषयक वास्तवाचे
आणि अंदाजाचे वस्तुनिष्ठ निवेदन करणारा सविस्तर अहवाल सादर करता येईल. मराठी भाषेचे विविध आघाड्यांवर संवर्धन व संरक्षण करण्याचे कंकण बांधलेल्या कितीतरी स्वयंसेवी संघटना महाराष्ट्रात तळमळीने काम करीत आहेत. शासकीय भाषा व संस्कृती विभाग, विद्यापीठातील मराठी विभाग, अधिकृत साहित्य संस्था, परिषदा, मंडळे, संघ भाषाविषयक किंवा साहित्यविषयक असे काही काम करतांना क्वचितच दिसतात.
तथापि याही सर्व संस्था-परिषदा-विद्यापीठांना या कामात सामील करून घेतलेले बरे.

वस्तुनिष्ठ निवेदन व अंदाजावर आधारित हा आयोग धोरणात्मक निदेर्शन देखील करू शकेल. पुढील चार बाबतीतच धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची कणखरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

अ)प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षणाचे माध्यम. विज्ञान शाखांचे व तंत्रज्ञानांचे शिक्षण मराठीत देणे कितपत शक्य आहे व त्यासाठी काय तयारी करावी लागेल - विशेषत: सोप्या परिभाषेची - त्याची आखणी करावी लागेल. याबाबतीत मात्र सर्वत्र समान धोरण हवे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होते. जगभरातील माहिती व ज्ञान संचयाला ते हात घालू शकतात व
स्पधेर्मधे पुढे निघून जातात. मराठी माध्यमाच्या मुलांना न्यूनगंड निर्माण होतो. राज्यघटनेनुसार अधिकृत राज्यभाषेचा माध्यम म्हणून सर्व शाळांवर सक्ती करता येत नसेल तर समानता राखण्यासाठी अटळपणे माध्यमिक शाळांचे माध्यम इंग्रजी ठेवणे भाग पडेल. त्यामधे ग्रामीण भागात मराठी आणि शहरी भागात इंग्रजी असा दुजा भाव करणे म्हणजे भविष्यासाठी भयंकर विषमतेची आणि संघर्षाची बीजे
पेरल्यासारखे होईल. या आयोगानेच योग्य मार्गदर्शन करावे लागेल.

आ)माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार केला नाही तरी जोडभाषा म्हणून शिकविण्यासाठी उत्तम दर्जाचे इंग्रजी व मराठी भाषा शिक्षक ग्रामीण भागात नेमणे. मुलांना ज्ञानभाषा आणि मातृभाषा दोन्ही चांगल्या आल्या पाहिजेत. माध्यम कोणतेही असो. जे तज्ज्ञ ठरवितील.

इ)शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी राज्यातील सार्वजनिक व शासकीय व्यवहारात शक्यतो मराठीचा वापर होणे. शासनाने धोरणविषयक निर्णय घेऊन हे होणार नाही. त्यासाठी लोकांमधेच स्वभाषेचे सच्चे प्रेम हवे.

ई)मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य इंग्रजी-हिंदीमधे किंवा नव्या जागतिक भाषेमधे नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा. महाराष्ट्रात शासन किंवा साहित्य संस्था कोणीही याबाबतीत संघटित प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे खरेच जागतिक भाषेचा लोंढा आला तर मराठीची परिस्थिती कठीण होईल.

इ)महाराष्ट्राचे भाषाविषयक धोरण अखिल भारतीय धोरणाशी सुसंगत ठेवणे.

असे कोणते भाषाविषयक समान सूत्र आज तरी भारतात नाही. त्यामुळे महागड्या पब्लिक स्कूलांमधून शिकलेले आणि इंग्रजी ही मातृभाषेसारखीच असलेले आणि इतर भारतीय भाषांपासून दुरावलेले लोकच आज भारतावर औपचारिक आणि अनौपचारिक सत्ता गाजवतात. हे थांबवून भारतीय संस्कृतीचे संचित उगवत्या जागतिक संस्कृतीशी जोडायचे असेल तर सर्व प्रांतांमधून उठाव करून भाषाविषयक समान सूत्र स्वीकारायला हवे.
त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाषातज्ज्ञ राष्ट्रपातळीवर मुख्यमंत्र्यांची व तज्ज्ञांची बैठक आयोजित करून राष्ट्रीय भाषा आयोग नेमण्याचा आग्रह धरू शकतात. प्रश्न तेवढा गंभीर आणि सर्वव्यापी आहे. कोणा एकाच भारतीय भाषेत आपण सर्व व्यवहार करू शकू, विज्ञान-तंत्रज्ञानाचा पूर्ण अवलंब करून उच्च दर्जा गाठू शकू आणि जागतिक स्पधेर्त टिकू शकू हा भ्रम आहे हे लवकरच लक्षात
येईल. म्हणूनच असा व्यापक विचार-विनिमय करून धोरणे ठरविणे आताच आवश्यक झाले आहे.

प्रश्न आहे नेत्यांच्या इच्छाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा. त्यांचा अभाव कायम राहिला तर भाषा-विषमता वाढीस लागून गंभीर परिस्थिती उदभवू शकेल. सगळ्यात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसेल कारण आपण मराठी माणसे एका बाजूला इतरांपेक्षा मातृभाषेविषयी अत्यंत बेफिकीर असून तिला तुच्छपणे तर वागवतोच आणि दुसऱ्या बाजूला मात्र मराठीत सर्व काही आनंदी आनंद असून तिला काही झाले नाही, ही फक्त
अमेरिकेत मुले पाठविणाऱ्या शहरी मध्यमवगीर्यांची ओरड आहे, असे सांगून निष्पाप मुलांना फसवीत असतो.

No Comments yet »

July 20th 2008

सुप्रभात् ..

विठ्ठलाचे पायी थरारली वीट
विठ्ठलाचे पायी थरारली वीट
राउळीची घाट, निनादली ॥१॥

ज्ञानोबांचे दारी शहारे पिंपळ
इंद्रायणी-जळ, खळाळले ॥२॥

उठला हुंदका देहूच्या वाऱ्यांत
तुका समाधीत, चाळवला ॥३॥

सज्जनगडात टिटवी बोलली
समाधी हालली, समर्थांची ॥४॥

एका ब्राम्हणाच्या पैठणपुरीत
भिजे मध्यरात्र, आसवांनी ॥५॥

अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥६॥

संत-माळेतील मणी शेवटला
आज ओघळला, एकएकी ॥७॥

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - राम कदम
स्वर - पं. भीमसेन जोशी

No Comments yet »

July 19th 2008

Marathi News

For all of you who like to read Marathi News, I’ve written crawlers that grab latest headlines from popular newspaper. If you’d like to add additional newspapers, please let me know.

The problem with several of the newspapers is fonts. Some of them, such as Sakal and Ma. Ta. use Unicode which is easier to display. Others like Loksatta use older generation ‘iso’ based fonts. These display as junk characters in the browser if you don’t have them on the system of have dynamic fonts enabled. So if you go to news page, and find that Loksatta newspaper is not being displayed correctly, you know why.

आणि हो- मला काय वाटते ते जरुर कळवा…

No Comments yet »

July 19th 2008

MarathiOnline Forum

For all of you who are looking to intereact for other members, there is a forum available. Feel free to post your favorite article there. You can also write about कथा, कविता, विनोद, महाराष्ट्र- वगैरे वगैरे.

आणि हो- आता तुम्हाला तुमच्या comments एथे खालीच लिहिता येतात!!

No Comments yet »

July 18th 2008

नमस्कार मंडळी!

Welcome to Marathionline.com. I have decided to change the format of Marathi Online because there was not much useful content on the first page, and the site lacked the interactivity that I was hoping for. So with this format, I have kept all the earlier content and hope that it’ll be lot more interactive.

No Comments yet »

December 2nd 2007

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना
मीच अथांग होऊन जातो…

तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो …
तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना
मीच अथांग होऊन जातो…

तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो …

तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना
मीच गुंतून जातो …

तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना
मीच हरवून जातो …

तुझ्या हाताला स्पर्श करताना
मलाच तुझा स्पर्श होतो …

तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो…
- सागर

No Comments yet »

October 2nd 2007

जलसमाधी …

क्षितीजावर सूर्योदय होत असताना
त्याच्या तेजाने डोळे दिपत असताना
माणसाला कुठलेच भान राहात नाही
त्या तेजस्वी सूर्याकडे तो आवेगाने झेप घेतो…..

क्षितीजावर सूर्योदय होत असताना
त्याच्या तेजाने डोळे दिपत असताना
माणसाला कुठलेच भान राहात नाही
त्या तेजस्वी सूर्याकडे तो आवेगाने झेप घेतो
पण, झेप घेताना एक गोष्ट मात्र तो विसरतो
की, खाली अथांग सागर पसरलेला आहे
सागराच्या अथांगतेची त्याला जाणीव होते,
पण, तेव्हा खूप उशीर झालेला असतो
कारण तो आकाशातून सागराकडे वळालेला असतो
आणि थोड्याच वेळात त्याला त्याच्या
उगवत्या सूर्याच्या स्वप्नांबरोबर
जलसमाधी मिळते …. कायमची ….

No Comments yet »

December 2nd 2006

जखमांची कर्जे नि कर्जांच्या जखमा….

पकूशेठने आपल्या डोळ्यापुढून चाळीसाव्यांदा ती यादी फिरविली आणि पुन्हा एकदा दुःखात वाहून गेले. त्यांच्या यादीत होते अशी काही नावे, ज्यांना त्यांनी उधारी दिली होती. पण घेणाऱ्यांना ती उधारी वाटत नव्हती. त्यांच्यालेखी ते पकूशेठचे त्यांच्यावरील ऋण होते व आजन्म त्याच ऋणात राहण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यातील काहीजणांनी पकूशेठकडेच नव्हे तर त्यांच्या घराच्या आसपासदेखील फिरकायचे थांबविले होते. पकूशेठना त्रास होत होता तो त्याचा. एकवेळ पैसे नका देऊ पण असे वागू नका. निदान सांगा तरी पैसे नाही परत करता येणार म्हणून, असे त्यांचे म्हणणे होते.

यादी एकेचाळीसाव्यांदा वाचताना त्यांना यादीतील थोर मंडळींनी सांगितलेल्या सबबी आठवल्या. त्या अशाः

दिनू दिवेकरः काय पकूशेठ. बरे झाले दिसलात. मला आत्ता काही पैसे हवे होते. इंजिनिअरिंगचा अर्ज भरायचा आहे. हे आत्ताचे व आधीचे सगळे एकत्रच घ्या.
पकूशेठः अरे असे कसे..एकतर आधीच्या पैशाला आता वर्ष होत आले…तितक्यात दुसरे कर्ज?
दिनूः नाही ना जमत? मग आता हटकू नका. ऐपत असेल तर आणखी पैसे द्या. नसेल तर जुने परत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही..समजले….?
धाड…धाड…धाड….चार लोकांना ऐकू जाईल असा आवज करीत दिनू निघून गेला.

अंता बोंबीलकरः काय पकूशेठ, आज इकडे कुठे
पकूशेठः काही नाही…तेच तुमच्याकडे माझे येणे बाकी विचारायला आलो होतो.
अंताः येणे बाकी…ती तुम्हाला असेल. आम्हाला देणे बाकी काही नाही. पकूशेठ पैसे कुठे पळूनशान जातात का…कशाला उगा त्रास करुन घेता…एवढे मोठे सावकार तुम्ही..आमच्यासारख्याच्या पोटावर पाय कसा द्यावा वाटतो हो तुम्हाला…
पकूशेठः पोटावर पाय…
अंताः मग नाय तर काय…अहो…तुमच्या पैशातून आणलेली होंडा परवाच विकली. त्यातून जे काही मिळाले होते..त्यातून ही फळाची गाडी घेतली. आता तुमी पैशे मागितले तर मला ही गाडी विकावी लागेल..बरं ती विकूनही फायदा नाही.कारण त्यातून तुमची उदारी फिटणार नाही. आणि जरी विकली तरी तुमचेबी भागणार नाही आणि आमचेबी. त्यापेक्षा जवाकधी धंद्याला बरकत ईल, तवा तुमच्याकडे ही गाडी घेऊनशान येतो की नाय बघा…

अंताची गाडी कधी आलीच नाही आणि `हेच फळ काय मम पैशाला…`असा विचार करीत पकूशेठ दुःखी झाले.

साहेबराव अण्णाः काय पकू..कसा आहेस..लेकरंबाळं मजेत हायंत नवं…?
पकूशेठः सगळं बरं आहे…मी जरा त्या माझ्या पैशाची आठवण करुन द्यायला आलो होतो…
अण्णाः पैसे…मला आठवतं तसं तू मला काही देणं नाहीस लागत….
पकूशेठः तसं नाही अण्णा…तुम्ही माझ्याकडनं घेतले होते..
अण्णाः तुझ्याकडून….? कधी
पकूशेठः अण्णा दोन वर्ष झाली..दोनचारदा तुमच्या कडे निरोपबी धाडला होता.
अण्णाः नाही बा…मला काहीच निरोप नाही आला…बरं जाऊदे, तुला पैशाची नड हाय म्हण की…जरा कारखान्यात ऊस जाऊ दे..काहीतरी देतो तुला..नंतर खुशाल परत दे सवडीनं….
पकूशेठः नाही. नको….निघतो.॥..

नाना सबबी सांगून अनेकांनी पकूशेठच्या कर्जवसुलीची मोहीम कायमची थांबविली…आपल्या भिडस्त स्वभावामुळे नाही म्हणू न शकणारा एक चांगला माणूस समाजाने वापरुन फेकून दिला…अगदी त्याच्या गरजेलाही कोणी धाऊन आले नाही. पकूशेठला जे जाणवलं ते कधीतरी आपल्याला नक्कीच जाणवलेले असते..कारण कर्ज पैशांचीच असतात असं नाही..आणि नातीही रक्ताचीच असतात असंही नाही….

गेली ती उधारी
उरला तो चकवा;
बुडली ती मैत्री
कशाला आठवा..?

दिसला तो जेव्हा
गाडीतून हसला;
धक्का अन तेव्हा
धसक्याहून बसला…

जखमांची कर्जे नि
कर्जांच्या जखमा;
नोटांना देऊ कशा
नात्यांच्या उपमा…?

No Comments yet »