Archive for the 'Katha' Category

July 19th 2008

MarathiOnline Forum

For all of you who are looking to intereact for other members, there is a forum available. Feel free to post your favorite article there. You can also write about कथा, कविता, विनोद, महाराष्ट्र- वगैरे वगैरे.

आणि हो- आता तुम्हाला तुमच्या comments एथे खालीच लिहिता येतात!!

No Comments yet »

June 3rd 2007

शाहुस्पर्श महाराज

श्री. बी. टी. तळेकर यांनी पाठवलेला लेख- कै. विनायक साळवी यांनी लिहिलेला. यापुर्वी हा लेख लोकसत्ता दिवाळी अंकात २००३ साली प्रसिद्ध झाला आहे.

No Comments yet »

December 2nd 2006

जखमांची कर्जे नि कर्जांच्या जखमा….

पकूशेठने आपल्या डोळ्यापुढून चाळीसाव्यांदा ती यादी फिरविली आणि पुन्हा एकदा दुःखात वाहून गेले. त्यांच्या यादीत होते अशी काही नावे, ज्यांना त्यांनी उधारी दिली होती. पण घेणाऱ्यांना ती उधारी वाटत नव्हती. त्यांच्यालेखी ते पकूशेठचे त्यांच्यावरील ऋण होते व आजन्म त्याच ऋणात राहण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यातील काहीजणांनी पकूशेठकडेच नव्हे तर त्यांच्या घराच्या आसपासदेखील फिरकायचे थांबविले होते. पकूशेठना त्रास होत होता तो त्याचा. एकवेळ पैसे नका देऊ पण असे वागू नका. निदान सांगा तरी पैसे नाही परत करता येणार म्हणून, असे त्यांचे म्हणणे होते.

यादी एकेचाळीसाव्यांदा वाचताना त्यांना यादीतील थोर मंडळींनी सांगितलेल्या सबबी आठवल्या. त्या अशाः

दिनू दिवेकरः काय पकूशेठ. बरे झाले दिसलात. मला आत्ता काही पैसे हवे होते. इंजिनिअरिंगचा अर्ज भरायचा आहे. हे आत्ताचे व आधीचे सगळे एकत्रच घ्या.
पकूशेठः अरे असे कसे..एकतर आधीच्या पैशाला आता वर्ष होत आले…तितक्यात दुसरे कर्ज?
दिनूः नाही ना जमत? मग आता हटकू नका. ऐपत असेल तर आणखी पैसे द्या. नसेल तर जुने परत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही..समजले….?
धाड…धाड…धाड….चार लोकांना ऐकू जाईल असा आवज करीत दिनू निघून गेला.

अंता बोंबीलकरः काय पकूशेठ, आज इकडे कुठे
पकूशेठः काही नाही…तेच तुमच्याकडे माझे येणे बाकी विचारायला आलो होतो.
अंताः येणे बाकी…ती तुम्हाला असेल. आम्हाला देणे बाकी काही नाही. पकूशेठ पैसे कुठे पळूनशान जातात का…कशाला उगा त्रास करुन घेता…एवढे मोठे सावकार तुम्ही..आमच्यासारख्याच्या पोटावर पाय कसा द्यावा वाटतो हो तुम्हाला…
पकूशेठः पोटावर पाय…
अंताः मग नाय तर काय…अहो…तुमच्या पैशातून आणलेली होंडा परवाच विकली. त्यातून जे काही मिळाले होते..त्यातून ही फळाची गाडी घेतली. आता तुमी पैशे मागितले तर मला ही गाडी विकावी लागेल..बरं ती विकूनही फायदा नाही.कारण त्यातून तुमची उदारी फिटणार नाही. आणि जरी विकली तरी तुमचेबी भागणार नाही आणि आमचेबी. त्यापेक्षा जवाकधी धंद्याला बरकत ईल, तवा तुमच्याकडे ही गाडी घेऊनशान येतो की नाय बघा…

अंताची गाडी कधी आलीच नाही आणि `हेच फळ काय मम पैशाला…`असा विचार करीत पकूशेठ दुःखी झाले.

साहेबराव अण्णाः काय पकू..कसा आहेस..लेकरंबाळं मजेत हायंत नवं…?
पकूशेठः सगळं बरं आहे…मी जरा त्या माझ्या पैशाची आठवण करुन द्यायला आलो होतो…
अण्णाः पैसे…मला आठवतं तसं तू मला काही देणं नाहीस लागत….
पकूशेठः तसं नाही अण्णा…तुम्ही माझ्याकडनं घेतले होते..
अण्णाः तुझ्याकडून….? कधी
पकूशेठः अण्णा दोन वर्ष झाली..दोनचारदा तुमच्या कडे निरोपबी धाडला होता.
अण्णाः नाही बा…मला काहीच निरोप नाही आला…बरं जाऊदे, तुला पैशाची नड हाय म्हण की…जरा कारखान्यात ऊस जाऊ दे..काहीतरी देतो तुला..नंतर खुशाल परत दे सवडीनं….
पकूशेठः नाही. नको….निघतो.॥..

नाना सबबी सांगून अनेकांनी पकूशेठच्या कर्जवसुलीची मोहीम कायमची थांबविली…आपल्या भिडस्त स्वभावामुळे नाही म्हणू न शकणारा एक चांगला माणूस समाजाने वापरुन फेकून दिला…अगदी त्याच्या गरजेलाही कोणी धाऊन आले नाही. पकूशेठला जे जाणवलं ते कधीतरी आपल्याला नक्कीच जाणवलेले असते..कारण कर्ज पैशांचीच असतात असं नाही..आणि नातीही रक्ताचीच असतात असंही नाही….

गेली ती उधारी
उरला तो चकवा;
बुडली ती मैत्री
कशाला आठवा..?

दिसला तो जेव्हा
गाडीतून हसला;
धक्का अन तेव्हा
धसक्याहून बसला…

जखमांची कर्जे नि
कर्जांच्या जखमा;
नोटांना देऊ कशा
नात्यांच्या उपमा…?

No Comments yet »

November 2nd 2006

गणूचा फ्रेंडशिप डे

नुकताच साजरा झालेला फ्रेंडशिप डे गणूच्या आयुष्यात मॊठ्या अक्षरांत (किंवा फॉन्टमध्ये) लिहिला जाईल. याचे कारण म्हणजे, आयुष्यात प्रथमच त्याने आपल्या काही दोस्तांना पत्र लिहिले (ते अजून पोस्ट केले नाही…पण लिहिले हे काय कमीय!) आम्हाला त्याचा सुगावा लागला व आम्ही ते अक्षरधन मिळविले…….ते जशास तसे देत आहोत……..

प्रिय मक्या,

बालपणीचा काळ सुखाचा…असे म्हणतात. पण हे शब्द खोटे ठरविण्यासाठी ज्या ज्या मास्तरांनी माझा छळ केला, त्यांचा बदला घेण्याचे आद्यकर्तव्य पार पाडण्यास तू मला भाग पाडलेस. (म्हणूनच मी इथे(च) राहिलो). तर आज मी जो काही आहे (आणि नाही) त्याचे श्रेय तुला द्यावेच लागेल.

मला अजून आठवते. आपण सातवीत असताना, आपण शिकवणीसाठी जात असलेलो (हो..शाळेतलेच) माळी मास्तर. आपण रोज सकाळी त्यांच्या घरी शिकवणीसाठी जायचो आणि तू बाहेर लावलेली त्यांची सायकल गुपचूप पंक्चर करायचास. बिचारे सर, रोजचे पंक्चर काढून थकले, त्यांची तब्येत उतरली (आणि पंक्चरवाल्याची तब्येत सुधारली). एकदा मी नसताना, तू त्यांना म्हणालास..सर आज तुमची सायकल पंक्चर होणार नाही..कारण आज गण्या नाही…तुझ्या या वाक्याने माझे शालेय जीवनात वादळ आणले. माळी सरांनी मग माझी अशी काही कटाई केली की माझी शिक्षणबाग कधी फुललीच नाही. त्यांनी या गोष्टीचा बोभाट सर्वत्र केला आणि अकारण माझी इमेज बदलली. पोरं तर सोडाच, गुरुजी लोकसुद्धा गण्या..लेका सायकल लावू का …पंक्चर तर करणार नाहीस, असे म्हणू लागले.

दुसरी आठवण तर विसरणे, केवळ अशक्य. आपल्या शाळेत टिळक जयंतीनिमित्त विद्यार्थी वक्तांची नावे द्यावे, अशी नोटीस आली तेव्हा तू माझ्या परस्पर माझे नाव नोंदवले. ऐन कार्यक्रमात माझे नाव पुकारले गेलो..तेव्हा जो दरदरा फुटलेला घाम आहे, तो अजून थांबलेला नाही. त्या क्षणाने माझी शालेय सार्वजनिक जीवन उद्धवस्त केले. बळेच व्यासपीठावर आलो…लोकमान्य टिळकांविषयी मी बापुडा काय सांगणार…त्यांच्याविषयीचे माझ्या मनातल्या भावना मी शब्दांत व्यक्त करु शकणार नाही…असे म्हणालो…माझ्या डोळ्यातले पाणी पाहून मला खाली बसविण्यात आले. ही तुझीच करामत असल्याचे नंतर लक्षात आले….टिळक तुला कधीच माफ करणार नाहीत.
किती किती आठवणार… दापके सरांच्या घरी सर रस्त्यावर पडल्य़ाचा माझ्या नावाने तू केलेला फोन, गायकवाड सरांना गाता येत नाही असे मी म्हणाल्याचा त्यांना केलेला रिपोर्ट, जांभळे मॅडम कविता शिकविताना उड्या मारतात, असा मी प्रसार केल्याचा तू केलेला प्रचार इत्यादी इत्यादी…अशा प्रकारांमुळे काही कारण नसताना मी बहुतेक सर्व विषयांच्या शिक्षकवर्गाच्या कोपास पात्र जाहलो…अनेकदा परिक्षेत अपात्र जाहलो… गुरुजन व पालकजनांकडून माझा छळ सुरु झाला व त्यातून मला खरोखरच खोड्या करण्याचे बळ आले, हे गोष्ट निराळी.

अजून काय लिहिणार…फ्रेंडशिप डे दिवशी मला आता कुणी अचानक बोलायला लावले, तर मित्र नसावा तर असा…हे मी सदोहारण देत बोलू शकतो. आपल्या वेळी फ्रेंडशिप डे नव्हता…असता तर तू बकऱ्याला मारण्यापूर्वी त्याला सजवतात, तसे आमच्या हातात बॅंड लावून नंतर आमचा बॅंड वाजवला असता…(बॅंड न लावला तू परिणाम साधलास…तुसी बडे ग्रेट हो यार…) तू काय कुठे आहेस…काय करतोस माहिती नाही..तुला मी आठवणारही नाही…पण तुझी आठवण आल्याशिवाय आमच्या शाळेच्या आठवणीही सांगता येत नाहीत.

No Comments yet »